हॅमिल्टन : सलामीवीरांसह मधल्या फळीने केलेल्या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघाला गुरुवारी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडकडून ६२ धावांनी पराभव पत्करावा लागला. उपकर्णधार हरमनप्रीत कौरने (६३ चेंडूंत ७१ धावा) भारताचा पराभव टाळण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली.
हॅमिल्टन येथे झालेल्या या दुसऱ्या साखळी सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या २६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव ४६.४ षटकांत १९८ धावांत आटोपला. मिताली राज (५६ चेंडूंत ३१) आणि यास्तिका भाटिया (५९ चेंडूंत २८) यांना चांगल्या सुरुवातीचा लाभ उचलण्यात अपयश आले. त्याशिवाय त्यांनी चेंडू वाया घालवल्यामुळे मधल्या फळीवरील दडपण वाढले. सलामीवीर स्मृती मानधना (६), दीप्ती शर्मा (५) यांनी निराशा केली. शफाली वर्माला वगळण्याचा निर्णयही भारताला महागात पडला. न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज ली ताहुहूने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
प्रथम फलंदाजी करताना अॅमी सॅटर्थवेट (७५), अमेलिया कर (५०) आणि कर्णधार सोफी डिव्हाइन (३५) या त्रिकुटाने दिलेल्या योगदानामुळे न्यूझीलंडने ५० षटकांत ९ बाद २६० धावांपर्यंत मजल मारली. एक वेळ न्यूझीलंडचा संघ ४० षटकांत ४ बाद २१२ धावा अशा सुस्थितीत होता. मात्र पाकिस्तानविरुद्ध फटकेबाजी करणारी अष्टपैलू पूजा वस्त्रकारने या वेळी गोलंदाजीत कमाल दाखवली. तिने ३४ धावांत चार बळी पटकावून न्यूझीलंडच्या धावसंख्येला लगाम लावला.
फेब्रुवारीत झालेल्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडने भारतावर ४-१ असे वर्चस्व गाजवले होते. त्यामुळे भारताला या वेळी पराभवाची परतफेड करण्याची संधी होती. मात्र सांघिक कामगिरी करण्यात भारतीय महिला अपयशी ठरल्या. दुसऱ्या विजयासह न्यूझीलंडने गुणतालिकेत (तीन सामन्यांत चार गुण) दुसरे स्थान पटकावले, तर भारतीय संघ दोन लढतींमधील दोन गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. शनिवारी भारताची वेस्ट इंडिजशी गाठ पडेल.