मुंबई- कोणत्याही प्रशिक्षकाची सहचारिणी देखील या प्रशिक्षकाच्या शिष्यांची अप्रत्यक्षरीत्या गुरुमाऊली असते. जर निखिल दुबे याला धनंजय तिवारी यांच्या पत्नीने मुष्टायुद्धाची लढत खेळण्याबाबत आग्रह धरला नसता तर महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाची संधी गमावली असती.
ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध पंच आणि प्रशिक्षक शैलेश ठाकूर यांनी याबाबत सांगितले की,” निखिल याची उपांत्य लढत पाहण्यासाठीच धनंजय तिवारी हे दुचाकीवरून अहमदाबाद येथे निघाले होते. दुर्दैवाने वाटेतच त्यांचे अपघाती निधन झाले. त्याचे वृत्त निखिल याला उपांत्य फेरीच्या दिवशी सकाळी कळाले तेव्हां त्याने लगेच आपले सामान आवरले आणि तो परत मुंबई येथे येण्यास निघाला होता. महाराष्ट्र संघाबरोबर असलेले प्रशिक्षक श्री. सतीश चंद्र भट, श्री. विजय गुजर आणि व्यवस्थापक श्री. मदन वाणी यांनी त्याला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र उपांत्य फेरीत सहभागी न होण्याचा त्याचा ठाम निर्णय झाला होता.
श्री ठाकूर यांनी पुढे सांगितले, महाराष्ट्राच्या या पदाधिकाऱ्यांनी माझ्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हां मी देखील निखिल याला खूप वेळा मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्याने माझाही फोन घेतला नाही. अखेर त्याने माझा फोन उचलला त्यावेळी मी कै. तिवारी यांच्या कुटुंबियांसमवेत होतो. आम्हां कोणाचे ऐकेना हे पाहून कै. तिवारी यांच्या पत्नींनी अखेर निखीलशी संवाद साधला. “तू सुवर्णपदक जिंकलेस तर खऱ्या अर्थाने तुझ्या गुरुंना श्रद्धांजली वाहिल्यासारखी होईल”, असे जेव्हां श्रीमती तिवारी यांनी सांगितल्यावर निखिल हा उपांत्य लढतीसाठी तयार झाला आणि सुवर्णपदक जिंकण्याचे आश्वासन त्याने दिले.
निखिल याचे गुरुवारी येथे आगमन झाले. त्यावेळी त्याने आपले स्वागत करू नये असाच सल्ला सर्वांना दिला होता. विमानतळावरून त्याने थेट कै. तिवारी यांचे घर गाठले आणि त्यांच्या तस्विरीसमोर ते सुवर्णपदक ठेवले. त्यावेळी त्याच्या अश्रूंना खूपच बांध फुटला
होता. अखेर श्रीमती तिवारी यांनी त्याला खूप समजाविल्यानंतर तो शांत झाला.

यावेळी शैलेश ठाकूर यांच्याबरोबरच जितेंद्र तावडे आणि अन्य मुष्टीयुद्ध संघटक उपस्थित होते.