स्पोर्ट्स पॅनोरमा | छत्रपती संभाजीनगर
शालेय स्तरावरील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या बहुप्रतिक्षित लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. उद्या शनिवार, १९ सप्टेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून शहरातील औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे (एडीसीए) मैदान आणि देवगिरी कॉलेज मैदानावर सामने रंगणार आहेत.
स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून यंदा तब्बल २० नामांकित शाळांचे संघ मैदानात उतरणार आहेत. विशेष म्हणजे नॉकआऊट पद्धतीऐवजी राउंड रॉबिन लीग पद्धतीने प्राथमिक फेरी खेळवण्यात येणार असल्याने प्रत्येक संघाला किमान चार साखळी सामने खेळण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव शिरीष बोराळकर यांनी दिली.
सुभाष लोळगे यांच्या स्मरणार्थ स्पर्धा
औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष सुभाष लोळगे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांचे चिरंजीव विशाल लोळगे आणि लोळगे कुटुंबीयांनी पुढाकार घेतला आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला भारताचे दिग्गज माजी अष्टपैलू क्रिकेटपटू करसन घावरी तसेच सीएसएमआरडीएच्या सहआयुक्त अंजली धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती बोराळकर यांनी दिली.
२० संघांची चार गटांत विभागणी
स्पर्धेत सहभागी २० संघांची अ, ब, क आणि ड अशा चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात पाच संघ आहेत. प्रत्येक संघ आपल्या गटातील उर्वरित चार संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळणार आहे.
सर्वसाधारण नॉकआऊट स्पर्धेत पहिल्याच सामन्यात पराभूत झाल्यास संघाचे आव्हान संपुष्टात येते. मात्र, शालेय क्रिकेटपटूंना जास्तीत जास्त सामने आणि स्पर्धात्मक अनुभव मिळावा, या उद्देशाने यंदा राउंड रॉबिन लीग पद्धतीला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला प्राथमिक फेरीत चार सामने निश्चितपणे खेळता येणार आहेत.
१९ ते २७ सप्टेंबरदरम्यान ४३ सामने
स्पर्धेचा थरार १९ ते २७ सप्टेंबर या कालावधीत रंगणार आहे. १९ ते २५ सप्टेंबरदरम्यान साखळी फेरीतील एकूण ४० सामने खेळवण्यात येतील.
चारही गटांतील अव्वल संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. २६ सप्टेंबर रोजी दोन उपांत्य सामने, तर २७ सप्टेंबर रोजी एडीसीए मैदानावर विजेतेपदाची अंतिम लढत खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे साखळी, उपांत्य आणि अंतिम सामना मिळून क्रिकेटप्रेमींना एकूण ४३ लढतींचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
एसएफएस विरुद्ध गायकवाड ग्लोबल सलामीची लढत
स्पर्धेची सलामीची लढत शनिवार, १९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता एडीसीए मैदानावर खेळवण्यात येईल. ग्रुप ‘ड’मधील एसएफएस हायस्कूल आणि गायकवाड ग्लोबल स्कूल यांच्यात पहिला सामना रंगणार आहे.
स्पर्धेदरम्यान दोन्ही मैदानांवर सकाळी ८.००, ११.०० आणि दुपारी २.०० वाजता अशा तीन सत्रांमध्ये सामने आयोजित करण्यात आले आहेत.

युवा क्रिकेटपटूंना गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी
शालेय स्तरावर दर्जेदार खेळपट्टीवर सातत्याने स्पर्धात्मक सामने खेळण्याची संधी मिळाल्यास युवा खेळाडूंच्या कौशल्याला चालना मिळते. त्यातून जिल्ह्यासाठी भविष्यातील गुणवंत क्रिकेटपटू शोधणेही शक्य होते. याच उद्देशाने प्रत्येक संघाला अधिकाधिक सामने देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे शिरीष बोराळकर यांनी सांगितले.
क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने मैदानावर उपस्थित राहून या शालेय क्रिकेट कुंभाचा आनंद घ्यावा आणि युवा क्रिकेटपटूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या सुरळीत आणि शिस्तबद्ध आयोजनासाठी राहुल टेकाळे यांच्यावर स्पर्धा आयुक्त म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
गटनिहाय सहभागी संघ
ग्रुप अ : द वर्ल्ड स्कूल, नॅशनल इंग्लिश स्कूल, एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूल, नाथ व्हॅली स्कूल, चाटे स्कूल.
ग्रुप ब : स्टेपिंग स्टोन हायस्कूल, होलीक्रॉस इंग्लिश स्कूल, केंब्रिज स्कूल, एचएपी इंटरनॅशनल स्कूल, राजा शिवाजी विद्यालय.
ग्रुप क : सीएसएन इंटरनॅशनल स्कूल, वूडरिज स्कूल, लिटल फ्लॉवर हायस्कूल, एसबी हायस्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल.
ग्रुप ड : एसएफएस हायस्कूल, गायकवाड ग्लोबल स्कूल, देवगिरी ग्लोबल ॲकॅडमी, आरजे इंटरनॅशनल स्कूल, लिटल एंजल स्कूल.




