दिल्लीत खेळल्या जात असलेल्या इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धेत (India Open 2022) करोनाने शिरकाव केला आहे. भारताच्या किदाम्बी श्रीकांत, अश्विनी पोनप्पा यांच्यासह सात खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले असून, सातही खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतल्याची माहिती जागतिक बॅडमिंटन महासंघाकडून (BWF) देण्यात आली आहे.
भारत सध्या करोना विषाणूच्या विळख्यात सापडला आहे. देशात दररोज सुमारे दोन लाख रुग्णांची नोंद होत आहे. त्याच वेळी, दिल्लीतही दररोज संक्रमित होणाऱ्यांची संख्या २० हजारांच्या जवळपास आहे. इतर खेळाडूंमध्ये रितिका राहुल, त्रिशा जॉली, मिथुन मंजुनाथ, सिमरन अमान आणि खुशी गुप्ता यांचा समावेश आहे.
BWF कडून सांगण्यात आले की, मंगळवारी या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व बॅडमिंटनपटूंची करोना चाचणी करण्यात आली. त्यांच्या अहवालात या सात खेळाडूंना संसर्ग झाल्याचे समोर आले. या बॅडमिंटन खेळाडूंसोबत दुहेरीत खेळलेल्या खेळाडूंनीही आपली नावे मागे घेतली आहेत.