या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने फक्त १ बळी घेतला होता. त्यामुळे काही जणांनी भारतीय गोलंदाजांवर या पराभवाचे खापर फोडले होते. टीकांचा सामना केल्यानंतर पुन्हा केपटाऊन कसोटीत गोलंदाजांनी कंबर कसली आहे .आणि त्याचा निकाल पाहायला मिळाला. बुमराहने पहिल्या डावात ५ बळी घेण्याची करामतही केली.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर त्याला या ऐतिहासिक कामगिरीबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला की, “मी रागावलो नव्हतो, मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित केले होते. लोक बाहेर काय म्हणतात, ते तुम्ही नियंत्रित करू शकत नाही, पण माझ्या हातात जे होते, ते मी केपटाऊनमध्ये केले.
मैदानाबाहेर सुरू असलेल्या गोष्टींचा संघावर खरोखर काही परिणाम होतो का, यावर उत्तर देताना बुमराह म्हणाला की, “काही लोक निंदा करतात, काही लोक कौतुक करतात. त्यांना काय करायचे आहे, ते तेच ठरवतात. बाहेरचे लोक काय बोलतात, याकडे मी लक्ष देत नाही. खरे सांगायचे तर मला काहीच फरक पडत नाही. मी जेव्हा गोलंदाजी करतो, तेव्हा त्यावर माझे नियंत्रण असते. त्यावर मी माझा पूर्ण जोर लावला. आता कुणाला ते आवडेल आणि कुणाला नाही.”
वाँडरर्स ते केपटाऊन या प्रवासादरम्यान बुमराह दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू मार्को जनसेनशी झालेल्या भांडणामुळे चर्चेत होता. वॉंडरर्समध्ये त्याच्याशी वाद झाला आणि केपटाऊनमध्ये बुमराहने त्याचा बदला घेतला. या संपूर्ण प्रकरणावर जेव्हा त्याला विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला की, ‘आता मी ते प्रकरण विसरलो आहे. आता आमचे लक्ष फक्त संघाचा विजयावर आहे.’