ॲथलेटिक्स मध्ये महाराष्ट्राचे आव्हान राहताना ऐश्वर्या मिश्रा हिने ४०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. तिची सहकारी डांयड्रा व्हॅलेदारेस हिने महिलांच्या शंभर मीटर्स धावण्याच्या शर्यतीत ब्रॉंझपदकाची कमाई केली तर आंतरराष्ट्रीय खेळाडू संजीवनी जाधव हिनेदेखील पाच हजार मीटर शर्यतीत ब्रॉंझपदक पटकाविले. पुरुषांच्या चार बाय शंभर मीटर्स धावण्याच्या रिले शर्यतीत महाराष्ट्राला ब्रॉंझपदक मिळाले.
ऐश्वर्या हिने सुरुवातीपासूनच आत्मविश्वास दाखवीत चारशे मीटर्सचे अंतर ५२.६२ सेकंदात पार केले आणि बीनामोल हिचा अकरा वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. बीनामोल हिने २००१ मध्ये ही शर्यत ५२.७१ सेकंदात पार करीत राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. ऐश्वर्या हिने शेवटच्या ५० मीटर्स अंतरात वेग वाढविला व ही शर्यत जिंकली. तिने आंध्र प्रदेशची खेळाडू ज्योतिकाश्री व उत्तर प्रदेशची रूपल कुमारी यांच्यावर मात केली.
महिलांच्या पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत संजीवनी जाधव हिने ब्रॉंझपदक पटकाविताना हे अंतर १६ मिनिटे ३९.९७ सेकंदात पूर्ण केले. ती नाशिक येथे विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. व्हॅलेदारेस हिने शंभर मीटर्स अंतराची शर्यत ११.६२ सेकंदात पूर्ण केली. ती नवी मुंबई येथे फादर ॲग्नेल अकादमीत सराव करते.
पुरुषांच्या शंभर मीटर्स शर्यतीत महाराष्ट्राचे प्रणव गुरव (१०.५६सेकंद) किरण भोसले व जय शहा (दोन्ही प्रत्येकी १०.६० सेकंद) हे तीन खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते तथापि त्यांना पदक मिळवण्यात अपयश आले. त्यांना अनुक्रमे पाचवे सहावे व सातवे स्थान मिळाले. अमलान बोर्गोहेन (१०.३८सेकंद), व्ही. एलाकिदास (१०.४४ सेकंद), शिवकुमार (१०.४४ सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व ब्रॉंझपदक मिळविले. पुरुषांच्या चार बाय शंभर मीटर रिले शर्यतीत महाराष्ट्राला अगोदर चौथे स्थान मिळाले होते. तथापि ब्रॉंझपदक मिळवणाऱ्या सेनादल संघास अपात्र ठरविण्यात आल्यामुळे महाराष्ट्राला तिसरे स्थान देण्यात आले. महाराष्ट्राने ही शर्यत ४०.६७ सेकंदात पार केली. तामिळनाडू (४०.०१) व केरळ (४०.४५सेकंद) यांना अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक मिळाले.