पणजी (प्रतिनिधी): पुरुष गटात शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठापूर्ण झालेल्या लढतीत महाराष्ट्र पुरूष संघाने सेनादलास पेनल्टी शूटआऊट (४-२)द्वारा १४-१२ (पूर्णवेळ १०-१०) असे पराभूत केले आणि ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्र संघ २६ वर्षांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरी पोहोचला होता. महिलांच्या गटात महाराष्ट्र संघाने कांस्यपदक मिळवताना कर्नाटक संघाचा १५-६ असा धुव्वा उडवला.
महाराष्ट्र व सेनादल यांच्यातील सामना विलक्षण रंगतदार झाला. सुरुवातीला ३-६ अशा पिछाडीवर असलेल्या महाराष्ट्र सरकारने उत्तरार्धात धडाकेबाज खेळ करीत पूर्ण वेळेत १०-१० अशी बरोबरी झाली. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये महाराष्ट्राने ४-२ असा विजय मिळविला त्याचे श्रेय महाराष्ट्राचा गोलरक्षक मंदार भोईरला द्यावे लागेल.
त्याने अप्रतिम गोलरक्षण करीत सेनादलाच्या दोन खेळाडूंना पेनल्टीद्वारा गोल करण्यापासून वंचित ठेवले. पेनल्टी शूट आउट मध्ये महाराष्ट्र संघाकडून अश्विनीकुमार कुंडे, पियुष सूर्यवंशी, श्रेयस वैद्य व उदय उत्तेकर यांनी यशस्वी गोल केला.
महाराष्ट्र महिला संघाने कांस्यपदकाच्या लढतीत निर्विवाद वर्चस्व गाजविले. त्यांनी कर्नाटकविरुद्ध १५-६ असा विजय मिळवला. त्याचे श्रेय कोमल किरवे (पाच गोल), मानसी गावडे (चार गोल) व राजश्री गुगळे (तीन गोल) यांना द्यावे लागेल. महाराष्ट्र संघाने पूर्वार्धात ९-३ अशी आघाडी घेतली होती.