न्यूझीलंड- पुढील महिन्यापासून न्यूझीलंडमध्ये महिला विश्वचषक 2022 खेळला जाणार आहे. तर आयसीसीने (ICC) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नियमांमध्ये मोठे बदल केलेले आहेत.करोनामुळे स्पर्धेमध्ये व्यत्यय येऊ नये, म्हणूनच हे बदल करण्यात आले आहेत.
या अंतर्गत, जर एखाद्या संघात करोना पसरला तर तो संघ किमान ९ खेळाडूंसह मैदानात उतरू शकेल. खेळण्याच्या अटींशी संबंधित आयसीसी मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ९ खेळाडूंसह सामन्यात प्रवेश करण्याचा नियम आधीपासूनच आहे. नुकत्याच वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या झालेल्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत या नियमाचा वापर करण्यात आला.
भारतीय अंडर-१९ संघातही करोनाचा शिरकाव झाला आणि अनेक सामन्यांमध्ये परिस्थिती अशी होती की, सामना खेळण्यासाठी ११ खेळाडू उरले होते. आयसीसी हेड ऑफ इव्हेंट ख्रिस टेटली यांनी गुरुवारी या बदलाची पुष्टी केली. ते म्हणाले, ”जर एखाद्या संघात करोना पसरला तर संघ ११ पेक्षा कमी खेळाडूंसह मैदानात उतरू शकतो आणि गरज पडल्यास संघ व्यवस्थापन आणि कोचिंग स्टाफमधून लोकांना प्लेइंग-११ मध्ये समाविष्ट केले जाऊ शकते.
महिला विश्वचषक २०२२ची सुरुवात यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील ४ मार्च रोजी होणाऱ्या सामन्याने होणार आहे. हा सामना माऊंट मौनगानुई येथे होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना ६ मार्च रोजी पाकिस्तानविरुद्ध टॉरंगा येथे खेळणार आहे.
करोना महामारी लक्षात घेऊन, सर्व संघांना राखीव म्हणून संघासोबत ३ अतिरिक्त खेळाडू आणण्यास मान्यता देण्यात आली आहे. संघात करोनाची प्रकरणे आढळल्यास राखीव खेळाडूंना १५ जणांच्या मुख्य संघात स्थान मिळू शकते. मात्र, गरज भासल्यास सामन्याचे वेळापत्रक बदलण्याचा पर्यायही असेल. न्यूझीलंडमध्ये सध्या करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत.