नवी दिल्ली : भारतीय क्रीडा विश्वातील कामगिरीसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाईल. त्यांनी ट्विटरव्दारे हि घोषणा केली.
भारतातील अनेक नागरिकांनी खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावानं असावं, असं म्हटलं होतं. मी त्यांच्या मतांसाठी आभार मानतो, असं म्हटलं आहे. त्यांच्या भावनांचा आदर करत खेलरत्न पुरस्कार आतापासून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावानं ओळखला जाईल, असं म्हटलं. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं नाव बदलून मेजर ध्यानचंद यांचं नाव पुरस्काराला देण्यात आलं आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. मात्र ही प्रतिक्रिया देताना काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस नेते अभिजीत सपकाळ, यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. महागाई कमी झाली, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख आले, 12 कोटी युवकांना नोकऱ्या मिळाल्या, गंगा नदी पूर्णपणे साफ झाली, भारत विश्व गुरू बनला, प्रत्येक भारतीयाचं लसीकरण झालं, कोरोना संपला, आता मात्र फक्त नामकरण उरलं होतं म्हणूनच मोदीजी नामकरण करत आहेत, असा टोला त्यांनी मोदींना लगावला आहे.