अहमदाबाद –भारताच्या कसोटी संघातील स्थान गमावणाऱ्या चेतेश्वर पुजाराने (८३ चेंडूंत ९१ धावा) रविवारी आक्रमक शैलीत खेळ करून सौराष्ट्राचा पराभव टाळला. पुजारा आणि स्नेल पटेल (१५५ चेंडूंत ९८) यांच्या अर्धशतकांच्या बळावर सौराष्ट्रने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या ड-गटात मुंबईविरुद्धचा साखळी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील अखेरच्या दिवशी सौराष्ट्रने दुसऱ्या डावात ९ बाद ३७२ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात फॉलोऑन पत्करूनसुद्धा सौराष्ट्रने दुसऱ्या डावात ४८ धावांची आघाडी घेतली. अखेर दिवसातील षटके संपल्याने पंचांनी सामना अनिर्णित झाल्याचे घोषित केले. मुंबईकडून फिरकीपटू शाम्स मुलानीने तब्बल सात बळी मिळवून सौराष्ट्रला झटपट गुंडाळण्यासाठी अथक प्रयत्न केले. मुंबईला पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण मिळाले, तर सौराष्ट्रने एक गुण मिळवला.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ७ बाद ५४४ (डाव घोषित)
सौराष्ट्र (पहिला डाव) : २२०
सौराष्ट्र (दुसरा डाव) : ११६ षटकांत ९ बाद ३७२ (स्नेल पटेल ९८, चेतेश्वर पुजारा ९१; शाम्स मुलानी ७/११४)
सामनावीर : सर्फराज खान