अहमदाबाद – भारताला पाचव्यांदा अंडर-१९ विश्वचषक जिंकून देणाऱ्या टीम इंडियाच्या यंगिस्तानचा आज अहमदाबादमध्ये गौरव करण्यात येणार आहे. १९ वर्षांखालील संघाचे सर्व खेळाडू विशेष पाहुणे म्हणून दुसरा एकदिवसीय सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले आहेत. सामना संपल्यानंतर गुजरात क्रिकेट असोसिएशन या सर्व खेळाडूंचा सन्मान करणार आहे. मात्र, कोविड नियमांमुळे अंडर-१९ संघाचे खेळाडू भारताच्या वरिष्ठ संघातील खेळाडूंना भेटू शकणार नाहीत.
भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतातील चार खेळाडूंना करोनाची लागण झाली होती. अशा परिस्थितीत कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. विश्वचषक विजेत्या संघात समाविष्ट असलेल्या प्रत्येक खेळाडूला ४० लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफला २५ लाख रुपये देण्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे.