बंगळूरु -दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा २३८ धावांनी दणदणीत विजय मिळवला.भारताने सोमवारी दुबळय़ा श्रीलंकेविरुद्धच्या प्रकाशझोतातील दुसऱ्या कसोटी सामन्यात २३८ धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली आणि दोन सामन्यांच्या मालिकेत २-० असे निर्भेळ यश मिळवले.
श्रीलंकेविरुद्धच्या दोन विजयांनिशी भारताने मालिकेतून २४ गुण कमावले असले, तरी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत ७७ गुण असतानाही ५८.३३ टक्क्यांमुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे.
श्रीलंकेकडून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या डावखुऱ्या करुणारत्नेने जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर चौकार खेचूत कारकीर्दीतील १४वे कसोटी शतक साकारले. त्याने कुशल मेंडिसच्या (६० चेंडूंत ५४ धावा) साथीने दुसऱ्या गडय़ासाठी ९७ धावांची बहुमोल भागीदारी केली. अखेरीस बुमरानेच (३/२३) करुणारत्नेचा त्रिफळा उडवला. मेंडिसने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत अर्धशतक पूर्ण केले; पण रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर तो चकला आणि ऋषभ पंतने यष्टिचीत करण्याची संधी साधली. त्यानंतर करुणारत्नेने निरोशान डिक्वेलाच्या (१२) साथीने पाचव्या गडय़ासाठी ५५ धावांची भागीदारी केली; पण अक्षर पटेलने पंतच्या साथीने ही जोडी फोडली. त्यानंतर श्रीलंकेचा उर्वरित निम्मा संघ भारताच्या गोलंदाजांनी ४८ धावांत तंबूत धाडला आणि विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.
भारत (पहिला डाव) : २५२
श्रीलंका (पहिला डाव) : १०९
भारत (दुसरा डाव) : ९ बाद ३०३ डाव घोषित
श्रीलंका (दुसरा डाव) : ५९.३ षटकांत सर्व बाद २०८ (दिमुथ करुणारत्ने १०७, कुशल मेंडिस ५४; रविचंद्रन अश्विन ४/५५)
सामनावीर : श्रेयस अय्यर
मालिकावीर : ऋषभ पंत