पणजी (प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गुरुवारी शानदार कामगिरीचे प्रदर्शन करीत पदकांचे दीडशतक ओलांडले आहे. जलतरण, टेबल टेनिस, अॅथलेटिक्स, कुस्तीमधील पदकांच्या बळावर महाराष्ट्राने आतापर्यंत ६० सुवर्ण, ४८ रौप्य आणि ५३ कांस्यपदकांसह एकूण १६१ पदके जिंकत पदकतालिकेतील अग्रस्थान टिकवले आहे. सेनादल (३७ सुवर्ण, १३ रौप्य, १३ कांस्य) दुसऱ्या आणि हरयाणा (३१ सुवर्ण, २१ रौप्य, ३३ कांस्य) तिसऱ्या स्थानावर आहेत.
जलतरणात महाराष्ट्राच्या वीरधवल खाडे आणि पलक जोशी यांनी प्रत्येकी दुसरे सुवर्णपदक जिंकले. या दोन सुवर्णपदकांसह महाराष्ट्राने दोन रौप्य व एक कांस्यपदके अशी एकूण पाच पदकांची कमाई केली. टेबल टेनिस क्रीडा प्रकारात दिया चितळेच्या दुहेरी यशामुळे महाराष्ट्राने आपली यशोपताका फडकवत ठेवली. दियाने मिश्र दुहेरीत सानिल शेट्टीच्या साथीने सुवर्णपदक, तर एकेरीत रौप्यपदक पटकावले.
महाराष्ट्राने टेबल टेनिसमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके कमावली. रोल बॉलमध्ये महाराष्ट्र महिला संघाला सुवर्णपदकाचा बहुमान मिळवून दिला, तर पुरुष संघाला रौप्यपदक मिळाले. अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या यमुना लडकतने महिलांच्या ८०० मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले.
याचप्रमाणे महाराष्ट्राच्या तायक्वांदोपटूंनी तीन कांस्य तर नंदिनी साळोखेने कुस्तीमधील ५० किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले.
तायक्वांदो महाराष्ट्राला तीन कांस्य पदके
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तायक्वांदो क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने गुरुवारी तीन कांस्य पदके पटकावली. महाराष्ट्राकडून प्रसाद पाटील, भारती मोरे आणि मृणाल वैद्य यांनी कांस्य पदके मिळवली.