छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी : आयपीएलमध्ये युवा खेळाडूंना लवकर संधी मिळते,पण देशाकडून कसोटी खेळण्यासाठी व संघात स्थान टिकवून ठेवणे अवघड आहे.यात तंत्र व परिपक्वतेचा कस लागतो.आता क्रिकेटमध्ये खूप पैसा आला आहे,मात्र भारताकडून खेळण्यासारखे दुसरे कोणतेही भूषण नाही,असे मत माजी कसोटीपटू करसन घावरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.एडीसीएम मैदानावर आयोजित कै.सुभाष लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
कपिलदेव निखंज यांचे प्रदीर्घ काळ मध्यमगती गोलंदाजीचे समर्थ साथीदार राहिलेले डावखुरे घावरी यांनी जवागल श्रीनाथ आणि व्यंकटेश प्रसाद या माजी गोलंदाजांनी माझा वारसा चालवला.एकेकाळी भारताकडे गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी वेगवान किंवा मध्यमगती गोलंदाजच नव्हता.अशावेळी सुनील गावसकर पहिले षटक टाकायचे.
रमाकांत देसाई,दत्तू फडकर,अमरसिंह,निसार अली यांनीही अशी भूमिका बजावली होती.पुढे 1983 साली विश्वचषकापासून मदनलाल,सचिन राॅजर बिन्नी, मनोज प्रभाकर नंतर श्रीनाथचा उदय होत आपली जलद व मध्यमगती मजबूत झाली असे ते म्हणाले.कपिलदेव-घावरी जोडीने तब्बल 25 सामन्यात प्रतिस्पर्धी सलामी जोडीला 100 पेक्षा जास्त धावांची भागिदारी न करू देण्याचाही विक्रम आहे.
वैभव सूर्यवंशी,अभिषेक शर्मा स्टार खेळाडू
घावरी म्हणाले,अभिषेक शर्मा जबरदस्त फलंदाज असून तंत्र व आक्रमकतायुक्त असून त्याचे भविष्य उज्ज्वल आहे तर वैभवाला आणखी जास्त संधी देत त्याच्यातील उणिवा दूर केल्या जातील.तो आक्रमकपणा सोडणारा नाही यासाठी रणजी,वनडे व नंतर कसोटी हाच प्रवास योग्य राहील. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना वगळण्याच्या व्यर्थ चर्चा कशाला? हे दोघेही अजून काही वर्षे खेळावेत! असे सांगत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने14व 16 वर्षांसह 19 वर्षांखालील सामने जिल्हावार आयोजित करावेत.
कसोटी क्रिकेटच दीर्घ स्पेलमधून परिपक्वत गोलंदाज घडवते.ऑस्ट्रेलियन ग्लेन मॅकग्राला खेळणे अवघड होते.तो माझ्या अधिक पसंतीचा पेसर असल्याचे ते म्हणाले.
यावेळी शिरीष बोराळकर,माजी कसोटीपटू इक्बाल सिद्दिकी,विशाल लोळगे,दिनेश कुंटे,अनंत नेरळकर, कर्मवीर लव्हेरा विशाल पांडे,निनाद खोचे उपस्थित होते.





